भाषा प्रेम खरे आणि बेगडी
सध्या मराठी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांबाबबत इत्यंभूत माहिती देत असताना, भारताच्या उत्तर बाजूला असणाऱ्या एका राज्यातील एका मानांकित विद्यापीठात मात्र वेगळेच नाट्य रंगतंय . आम्हला एक भाषा विषय शिकवायला अमुक एक प्राध्यापक नको , या कारणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे . सदर प्राध्यापक विषयातील तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला नाही . ते विद्यार्थ्यांना समजेल अश्या पध्द्तीने शिकवतात . मात्र तरीही हे प्राध्यापक या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नकोय . या विद्यार्थ्यांना यासाठी फार मोठे आंदोलन करायला सुरवात केली आहे .विद्यार्थ्यांचे आंदोलन का होत आहे ? याचा मागोवा घेतल्यास मन निराश करणारी परिस्थिती समोर येत आहे .
विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु झालेल्या या विद्यापीठाच्या नावात एका धर्माचा उल्लेख करण्यात आला आहे . ज्या भाषेवरून हे रणकंदन सुरु आहे , त्या भाषेत सदर धर्मांचे अध्यात्मिक साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे . आणि जे प्राध्यापक हा भाषा विषय शिकवणार आहेत , ते अन्य धर्मीय आहेत . बस या एका कारणावरून तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे .
आम्हला भिन्नलिंगी व्यक्तींकडे दूषित नजरेने बघणारा , विषयातील तज्ञता नसणारा , विषययातील क्लिष्टता विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने समजावून न सांगू शकणारा प्राध्यापक असला तरी चालेल मात्र तो सधर्मीय असावा असे या विद्यार्थ्यांना म्हणायचे आहे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे . जर हे खरे असेल तर ही देशापुढील खूप मोठी समस्या आहे आहे असेच म्हणावे लागेल . त्याच प्रमाणे एका धर्मीय प्राध्यापकाने अन्य धर्मीयांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या भाषेत तज्ज्ञता मिळवणे हा त्या भाषेच्या गौरवाबरोबरच भारताच्या विविधतेत एकात्मता या पैलूंसाठी मोलाचा दगड ठरला असता .
शिक्षकाची गुणवत्ता ही त्याची विद्यार्थ्यांप्रती असणारी आपुलकी , अवघड विषय सोपा करून देण्याची हातोटी न ठरता जर शिक्षकाचा धर्म ठरत असेल तर देशाच्या भविष्यविषयी न बोललेच बरे . स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या एका भाषणात मला तरुणांच्या मुखातील भाषा सांगा , मी देशाचे भविष्य सांगतो असे विधान केले होते . त्याचा या आंदोलनाशी संबंध जोडल्यास येणारे चित्र कसे असेल हे आपण सहज लक्षात घेऊ शकतो . ,
टिप्पण्या