विश्व पुस्तक मेळा आणि मराठी पुस्तक विश्व

       
                    आज 5 जानेवारीला  हा लेख लिहीत असताना नवी दिल्लीला प्रगती मैदान येथे पुस्तकप्रेमींचा कुंभमेळा म्हणून ज्यास सहजतेने संबोधता येईल,  असा  विश्व पुस्तक मेळा  मोठ्या दिमाखात सुरु आहे . 4 जानेवारीला सूरु  झालेला हा वाचकांचा कुंभमेळा 12जानेवारी पर्यंत चालू असेल .  मात्र जगातील 17व्या क्रमांकाची मातृभाषा असणाऱ्या मराठीचे या विश्व पुस्तक मेळ्यात स्थान काय आहे ? याचा आढावा घेतला असता समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही . कोणत्याही मराठी वृत्तवाहिन्यांवर याची एक मिनिटाची देखील बातमी मी बघितली नाही . मराठी साहित्यविश्वात साहित्य संमेलनाचे जे अनन्य साधारण महत्व आहे , तेच किंबहुना त्याहून कणभर अधिक असे महत्व जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार करता या विश्व साहित्य मेळाचे आहे . मात्र त्या ठिकाणी मराठीचे तुरळक अस्तिव आहे . मराठीतील साहित्याचा अवीट गोडवा जगासमोर येण्याची एक उत्तम
संधी यामुळे मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . भारताचा विचार करता मराठी भाषिक आज तिसऱ्या क्रमांकावर आहेत . जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या  देशात जिथे 21 अधिकृत भाषा आहेत . अश्या देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावयावरच्या भाषेच्या बाबतीत अशी स्थिती असणे नक्कीच भूषणावह नाही .
                       आज जगभरात वाचक कोणत्या विषयावरची पुस्तके वाचतात ?  त्या विषयावरची पुस्तके मराठीत आहेत का ? नसल्यासत्या विषयावर मराठीत सहजतेने लिहू शकतील अश्या व्यक्ती आहेत का ? हा सर्व शोध मराठीच्या तुरळक अस्तित्वामुळे थांबला आहे . आज मराठीत अनेक नवीन विषयावर पुस्तके निघत आहेत . त्याची गती यामुळे वाढली असती . मी मूळची अन्य भाषेतील मात्र मराठीत अनुवाद झालेली अनेक पुस्तके बघतो , मात्र त्या तुलनेत मूळची मराठीतील मात्र अन्य भाषेत भाषांतरित झालेली पुस्तके बघावयाला
मिळत नाहीत . जर खूप मोठ्या संख्येने मराठी प्रकाशक या ठिकाणी आले असते , तर या चित्रात नक्कीच बदल झाला असता हे नक्की . मूळचा  शेस्कपियरने इंग्रजी भाषेत आणलेला सॉनेट हा काव्य रचनेचा प्रकार मराठीत केशवसुतांनी आणला तो भाषा भेटीतूनच . या भाषा भेटीची एक अत्यंत छान संधी  विश्व पुस्तक मेळ्यात पुरेश्या प्रमाणत  सहभागी न झाल्याने मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . महाराष्ट्र सरकारतर्फे पुस्तकांचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलवड  हे गाव विकसित करण्यात आले खरे . मात्र हे प्रयत्न पुरेशे नाहीत वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी अजून जोमाने प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे सध्या सुरु असणाऱ्या नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील विश्व पुस्तक मेळ्यातील मराठीचा स्थितीवरून दिसून येते आहे अर्थात या चित्रात सकारात्मक बदल करण्याचे प्रयत्न सर्व पातळीवर सुरु आहेत . त्याला चांगले फळ लवकरच लागेल अशी अशा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो . नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?