गणेशाची साडेतीन पीठे
मोरगाव - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध
श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य. पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरगाव एस.टी. आहे.राजूर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. वरण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात. मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका
टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात. हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर,राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते.पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.
समुद्रामान्थानाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्ना झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धर्निश्वर गणेश' म्हणतात.
टिप्पण्या