जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची
हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन म्हणून मर्यादित नाहीये. आपण त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानवी भावनांचा वेध घेणारी एक समृद्ध अनुभवयात्रा म्हणू शकतो . तिबेटचा प्रवास हा भौगोलिकदृष्ट्या कठीण, उंच पर्वत, विरळ हवा आणि अनिश्चित परिस्थिती होत असला, तरी त्याच्या पलीकडे असलेली शांतता, साधेपणा आणि तिबेटियन बुधदी धर्माची अध्यात्मिकतेची ओढ मीना प्रभू यांनी अत्यंत सहजसोप्या शब्दात मात्र प्रभावी शब्दात मांडली आहे.
या पुस्तकात ल्हासा शहर, पोताला पॅलेस, विविध बौद्ध मठ आणि तेथील धार्मिक परंपरा यांचे जिवंत चित्रण दिसते. बौद्ध धर्माचा दैनंदिन जीवनावर असलेला प्रभाव, प्रार्थना चक्रे, साधूंचे जीवन आणि श्रद्धेने जगणारे सामान्य लोक यांचे सविस्तर केलेले वर्णन वाचकाला त्या वातावरणाचा पुस्तकाच्या माध्यमातून का होईना अनुभव देते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मीना प्रभू यांनी मांडलेले तिबेटी लोकांचे जीवन अत्यंत साधे, कष्टमय आणि तरीही समाधानाने भरलेले आहे. कठीण परिस्थितीतही त्यांनी जपलेली आनंदी वृत्ती आणि अध्यात्मिक निष्ठा वाचकाला विचार करायला भाग पडते
याचबरोबर तिबेट म्हंटल्याबरोबर बौद्धर्माखेरीज आपणासमोर जे चित्र सहजतेने डोळ्यासमोर येते त्या चीनच्या अधिपत्याखालील त्याच्या राजकीय परिस्थितीचीही जाणीव या पुस्तकातून होते. तिबेटी संस्कृतीवर झालेले परिणाम, त्यांच्या स्वातंत्र्यभावनेवरील मर्यादा आणि त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वेदना लेखिका मीना प्रभू यांनी अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे. दलाई लामांविषयी असलेली लोकांची निष्ठा आणि त्यांच्या प्रती असलेला आदर हा या समाजाचा महत्त्वाचा भावनिक आधार असल्याचेही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले
आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला केवळ माहिती मिळत नाही, तर त्या समाजाशी एक भावनिक नातेही निर्माण होते.लेखिका मीना प्रभू यांनी पुस्तकात वापरलेली भाषाशैली साधी, प्रवाही आणि चित्रमय असल्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. प्रवासातील अडचणी, निसर्गाचे अद्भुत वैभव आणि मानवी जीवनातील साधेपणा यांचा सुंदर मेळ या पुस्तकात गुंफलेला आढळतो वाचकाला वाचताना असे सातत्याने तो स्वतः या प्रवासाचा एक भाग आहे आणि प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष अनुभवत आहे.असे वाटावे या पद्धतीनेच लेखन लेखिका मीना प्रभू यांनी केले आहे
एकूणच,वाट तिबेटची’ हे पुस्तक तिबेटच्या भौगोलिक सौंदर्याबरोबरच तेथील संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक-राजकीय वास्तव यांचे सखोल दर्शन घडवणारे, विचारप्रवर्तक आणि मनाला स्पर्श करणारे उत्कृष्ट प्रवासवर्णन आहे. प्रवासप्रेमींसह वेगळ्या संस्कृतींची ओळख करून घेण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक निश्चितच वाचननीय ठरते.



टिप्पण्या