विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत
. मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात या खेरीस देवीप्रमाणेच गणपतीची साडेतीन ठिकाणे देखील आहेत . पहिल्यादा आपण विदर्भातील अष्टविनायकांची माहिती घेउया .वरदविनायक- टेकडी गणपती  विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. पहाटे साडेचारपासून विविध पूजाविधी इथे सुरू होतात. मंगळवार आणि शनिवार हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचे दिवस समजले जातात. या दोन दिवशी इथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, िपपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. त्यामुळे इथे विविध जातींचे पक्षिगण पाहायला मिळतात. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.
अठरा भुजांचा रामटेक येथील गणपती विदर्भाचे भूषण रामटेक हे श्रद्धास्थान.  विदर्भातील अष्टविनायकांपकी एक मुळात रामटेक हे स्थान अनेकार्थानी प्रसिद्ध आहे. याचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आहे. वनवासात असताना रामांचा मुक्काम या ठिकाणी होता असे समजले जाते. त्याचसोबत वाकाटक या बलाढय़ राजवंशाची राजधानी असलेल्या नंदिवर्धन या नगराजवळच हे ठिकाण आहे. कविकुलगुरू कालिदास यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘मेघदूत’ या काव्याची रचना याच रामटेक इथे केली असे समजले जाते. सापुतारा पर्वतरांगेवर वसलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे. वळणावळणाचे रस्ते, डोंगरावरून वाहणारे निर्झर आणि गर्द झाडी यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. वाकाटक, परमार, यादव, भोसले या राजवटींनी या ठिकाणी विविध मंदिरे बांधली. विदर्भातील अष्टविनायकातील एक स्थान यातलेच एक आहे आणि ते म्हणजे अष्टदशभुजा गणपतीचे मंदिर. मंदिराला तीन उत्तराभिमुख गाभारे असून तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती स्थापित केलेल्या दिसतात. या तीनही गाभाऱ्यांवर गणेशपट्टीच्या ठिकाणी कीíतमुखे कोरलेली दिसतात. नावाप्रमाणेच इथली मूर्ती अत्यंत वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण अशी आहे. अठरा हातांची गणपतीची मूर्ती काहीशी दुर्मीळच म्हणायला पाहिजे.
पापधुपेश्वर तीर्थाकडे जाताना वाटेत गवळीपुरा इथे हे मंदिर वसले आहे. अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची आहे. देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत. पकी एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत, असे स्थानिक सांगतात. तर अठरा सिद्धींमुळे या गणपतीचे पूजन विघ्नेश्वर म्हणून करतात, असे पुराणात सांगितले आहे. .मंदिरात महागणपती आणि त्यांच्या बाजूला रिद्धी-सिद्धींच्या मूर्ती आहेत. तसेच देवी महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा मंदिरात पाहायला मिळते. गणेश मंदिरासमोरच एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे.
सिद्धिविनायक एकचक्रा रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. अनेक स्थाने, अनेक गावे यांचा संबंध रामायण आणि महाभारताशी जोडला गेलेला आढळतो. त्यातूनच तयार होतात अनेक कथा, उपकथा, दंतकथा आणि मग त्या विशिष्ट स्थानाचे महत्त्व अजून उजळून निघते. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची कथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा
एकचक्रागणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत.  भाद्रपद आणि माघी चतुर्थीला इथे मोठा उत्सव असतो. मंदिराजवळच धर्मशाळा बांधलेली आहे.एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते.
सर्वतोभद्र गणपती –  भंडारा जिल्हय़ात, वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या पौनी गावात असलेला हा गणपती, म्हणजे विदर्भातील अष्टविनायकांपकी एक आगळावेगळा गणपती म्हणायला हवा. इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे दर्शन घेता येते. सर्व दिशांनी किंवा सर्व बाजूंनी ज्याचे दर्शन घेता येते तो सर्वतोभद्र किंवा अशा मूर्तीला सर्वतोभद्र मूर्ती असे म्हटले जाते.
पौनी गावाभोवती तटबंदी बांधलेली दिसते. परिसरातील इतर गावांसाठीची एक महत्त्वाची व्यापारी पेठ, असे या गावचे महत्त्व आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात एक छोटेखानी मंदिर असून त्यात ही गणपतीची मूर्ती प्रस्थापित केलेली दिसते. मंदिराच्या समोर एक गरुडखांब आहे. बांधकामात कोकणातल्यासारखे इथे चिरे वापरलेले दिसतात. हे मंदिर पालांदूर गावच्या श्रीहरिस्वामी जोशी यांनी बांधल्याचे सांगतात. या मंदिराची मालकी गेल्या १३ पिढय़ांपासून भट कुटुंबाकडे आहे.

भृशुंड गणपती –  मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपकी हा गणपती वसलेला आहे. या गणपतीला भृशुंडगणपती हे नाव कसे मिळाले याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. नामा कोळी लोकांना त्रास देत असे. तो या परिसरात वाटमारी करीत असे. एकदा तो गणेशतीर्थ या ठिकाणी अंघोळीला गेला असता मुद्गल ऋषी तिथून चालले होते. ते तोंडाने गजानन गजानन असे नामस्मरण करीत होते. नामा कोळ्याने त्यांना मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि तो आता वार करणार एवढय़ात ती तलवार गळून जमिनीवर पडली. नामा कोळ्याला पश्चात्ताप झाला आणि आपली पापे धुण्यासाठी काय करावे याची याचना त्याने मुदगल ऋषींकडे केली. मुदगल ऋषींनी त्याला सांगितले की ते परत येईपर्यंत नामा कोळ्याने श्री गणेशाय नम: असा जप सुरू करावा. तसेच त्यांनी एक वाळकी काठी दिली आणि तिला रोज पाणी घालायला सांगितले. जेव्हा त्या काठीला पालवी फुटेल तेव्हा मी परत येईन, असे आश्वासन मुद्गल ऋषींनी दिले. नामा आता मंत्राचा जप करू लागला. अनेक वष्रे अशीच गेली आणि मुदगल ऋषी तिथे परत आले. त्यांना त्या काठीच्या जागी एक भलामोठा वृक्ष आणि एक मुंग्यांचे वारूळ दृष्टीस पडले. वारुळातून श्री गणेशाय नम: असा आवाज येत होता. ऋषींनी ते वारूळ बाजूला करून पाहिले तर त्यांना नामा कोळी नामस्मरण करताना आढळला. तो गणेशसाधनेत इतका गणेशमय होऊन गेला होता की त्याला नाकाच्या ठिकाणी गणपतीप्रमाणे सोंड फुटली होती. मुदगल ऋषींनी त्याचे तप आणि त्याची सोंड पाहून त्याचे नामकरण भृशुंड ऋषी असे केले. या भृशुंड ऋषींनीच इथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. मुदगल ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की आणि जो कोणी या ठिकाणी दर्शनाला येईल त्याला सर्व शक्ती प्राप्त होतील असे सांगितले. मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो.
शमी विघ्नेश - नागपूरछिंदवाडा  लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडय़ापासून ४ कि.मी.वर असलेल्या एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात गणेशाची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडते. मूर्तीवर शेंदुराचे लेपन मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. परंतु ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंदिर व्यवस्थापनाने अतिशय नीटनेटकी अशी इथली व्यवस्था केलेली दिसते. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, पूजा-प्रसादाची वेगळी व्यवस्था, नारळ फोडण्यासाठीचे यंत्र अशा अद्ययावत सोयी भक्तांसाठी इथे केलेल्या आढळतात.याबद्दलची कथा अशी की महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र. या ठिकाणाची दुसरी कथा अशी की वालीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूने वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याने शमी विघ्नेशाची आराधना केली व त्याच्या कृपेने बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर वामनाने वक्रतुंड नावाने गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. इथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो. अविवाहित लोकांची या गणेशाच्या उपासनेने लग्न जमतात असे मानले जाते.
चिंतामणी गणेश -कळंब भक्तांच्या सर्व चिंतांचे हरण करणारा चिंतामणी वसला आहे नागपूर-यवतमाळ मार्गावरील कळंब या गावी. इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. अंदाजे १५ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. मूर्तीवर खूप मोठय़ा प्रमाणात शेंदूर चíचलेला असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत नाहीत. जवळच एक चौकोनी पावनकुंड असून त्याचे पाणी औषधी असल्याचे सांगतात. कोणतेही त्वचारोग त्या पाण्याने दूर होतात, असे इथे सांगितले जाते. या ठिकाणी एक निसर्गनवल पाहायला मिळते. इथे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह आहेत. त्या पाण्याची पातळी वाढायला लागून या गाभाऱ्यात पाणी साठू लागते आणि गणेशमूर्तीच्या पायाला पाणी लागले की पुन्हा ते ओसरते. असा प्रसंग बारा वर्षांतून एकदा घडतो.जवळच असलेल्या एका छोटय़ा गाभाऱ्यात शिविलग प्रस्थापित केलेले आहे. तसेच वरच्या पातळीत काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. एका खांबावर चारही बाजूंनी गणेश प्रतिमांचे अंकन केलेले पाहायला मिळते. मंदिरासमोर उभारलेल्या ध्वजस्तंभाचा हा अवशेष असल्याचे जाणवते. कळंब गावचे प्राचीन नाव कदंबसारक किंवा कदंबगिरिग्राम असल्याचे उल्लेख वाकाटक नृपती प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटात आलेले आहेत. कदंब ऋषींचा सुद्धा या स्थानाशी संबंध जोडला जातो.
वरदविनायक गौराळा  नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भद्रावती म्हणजे भांदक या ठिकाणी विदर्भातल्या अष्टविनायकांपकी एक असलेला वरदविनायक एका टेकडीवर वसलेला आहे. हे मंदिर असलेली टेकडी पूर्वी गायींना चरण्यासाठी राखीव होती म्हणून या ठिकाणाला गौराळा असे नाव पडले. या संपूर्ण परिसराला प्राचीनतेचा स्पर्श लाभलेला आहे. वाकाटक या बलाढय़ राजवटीखाली असलेला हा प्रदेश मोठा समृद्ध होता. तत्कालीन स्थापत्याचे जे काही अवशेष आज पाहायला मिळतात त्यात या ठिकाणाचा समावेश होतो. टेकडीवर चढत असताना वाटेत काही भग्न मूर्ती पाहायला मिळतात. याच टेकडीच्या मागच्या अंगाला एक गुहा खोदलेली असून त्यात काही सुंदर शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. त्यात गणपती, शेषशायी विष्णू, त्रिविक्रम या मूर्ती आहेतच, परंतु तिथेच दोन मीटर उंचीची केवल नरसिंहाची सुंदर मूर्ती कोरलेली दिसते. ही मूर्ती पाहून रामटेक इथल्या नरसिंहाच्या मूर्तीची आठवण होते.
गणपती मंदिराला १६ खांब असलेला भव्य सभामंडप आहे. गणपती मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहेत. मुख्य गाभारा काहीसा खालच्या पातळीत असल्यामुळे काही पायऱ्या उतरून प्रवेश करावा लागतो. आत अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो. देवाला दोनच हात असून दोनही हातात मोदकपात्र दिसते. गणपतीच्या पोटात काही धन असेल असे वाटल्यामुळे काही चोरांनी त्याची नासधूस केली होती. आता ते पूर्ववत केलेले आहे. गणपतीच्या मस्तकाभोवती प्रभामंडळ कोरले असून त्यावर मुकुट कोरलेला दिसतो. प्रसन्न अशी गणपतीची मूर्ती आणि हा सगळाच परिसर आवर्जून पाहावा असा आहे.भांदक अर्थात भद्रावती ही प्राचीन नागरी असून इथे झालेल्या विविध उत्खननामधून अनेक पुरातत्त्वीय अवशेष, विविध मूर्ती मिळालेल्या आहेत. 
हि झाली गणपतीची विदर्भातील आठ गणपतीची ठिकाणे . तुम्ही फिरायला जाणार ना मग ? 
विद्येची देवता असणाऱ्या गणपती देवतेची देशात २१ ठिकाणे आहेत . त्यापैकी साडेतीन ठिकाणे महाराष्ट्रात आहेत . त्यांची माहिती पोस्ट मधून देईल . तो पर्यंत सर्वांना नमस्कार . आणि गणपती बापा मोरया 



आजच्या ब्लॉगपोस्टसाठी ९ सप्टेंबर २०१६ रोजी लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा आधार घेण्यात आला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?